Social Media News

Social Media News
Social media News

Thursday, July 14, 2016

फ्रान्समध्ये ट्रकने चिरडले; ७३ जण ठार

मटा ऑनलाइन वृत्त । नीस (फ्रान्स)

फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत ७३ लोकांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले आहे.

फ्रान्समधील नीस शहरात फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमधील ही घटना असून या ठिकाणी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी असंख्य लोकांनी गर्दी केली होती. अचानक एका ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर अक्षरशः ट्रक घालून त्यांना चिरडले. या दुर्घटनेत ७३ जणांचा बळी गेला असून १०० जण जखमी झाले आहेत. मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाला याची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, बंदुका आहेत, अशी माहिती प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. ट्रकमधून गोळ्या झाडल्यांचा आवाज येत होती, माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली असली तरी प्रशासनाने मात्र याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याने हा दहशतवादी हल्ला आहे का? याचा तपास फ्रान्सचे पोलीस करीत आहेत.

Sunday, July 3, 2016

ख्रिस्ताचे हिंदुत्व

ख्रिस्ताचे हिंदुत्व
ramesh.khokrale@timesgroup.com

मुंबई : 'येशू ख्रिस्त हे तामिळ हिंदू होते आणि त्यांचे खरे नाव केशव कृष्ण होते. मुळात ख्रिस्ती धर्म हा अस्तित्वातच नव्हता, तो हिंदू धर्मातील एक पंथ होता, येशू भारतात आल्यानंतर त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले..', असे नानाविध दावे करणाऱ्या 'ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व' या वादग्रस्त पुस्तकाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी लिहिलेल्या या मराठी पुस्तकाविरोधात 'ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चन कौन्सिल ट्रस्ट' या संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'हे वादग्रस्त पुस्तक दोन धर्मांत व समाजांत तेढ निर्माण करणारे आहे. ख्रिस्ती धर्मातील लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवणारे आहे. तसेच देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडवणारे आहे. भारतीय दंड संहितेच्या १५३(अ), २९२, २९३, २९५(अ) या कलमांचा भंग करणारे आहे. त्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या कलम ९५खालील अधिसूचनेद्वारे त्याची प्रत्येक प्रत जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत. याविषयी कोर्ट रिसिव्हरची नेमणूक करावी आणि पुस्तकाच्या प्रकाशन-वितरणाला मज्जाव करावा', अशी विनंती संस्थेने अॅड. पंकज पुर्वे यांच्यामार्फत केलेल्या या फौजदारी जनहित याचिकेत केली आहे. या पुस्तकाचे २६ फेब्रुवारी २०१६ रोजी पुनःप्रकाशन होत असल्याचे कळताच राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनांना विनंती करूनही कारवाई झाली नाही. म्हणून याचिका करावी लागली असल्याचा दावाही संस्थेने केला आहे. याविषयी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी राज्यघटनेने अनुच्छेद १९मध्ये दिलेल्या भाषा स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कातील तरतुदींचा या पुस्तकामुळे भंग कसा होत आहे आणि त्याविषयीचे न्यायनिवाडे काय आहेत, याची तपशीलवार माहिती अभ्यास करून आमच्यासमोर ठेवा, असे याचिकादारांच्या वकिलांना सुचवून खंडपीठाने दोन आठवड्यांनी पुढची सुनावणी ठेवली.


पोलिस आयुक्तही प्रतिवादी या याचिकेत संस्थेने सरकारबरोबरच मुंबई पोलिस आयुक्त, शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व पुस्तकाचे संपादक-प्रकाशक आणि मुखपृष्ठाच्या चित्रकारांनाही प्रतिवादी केले आहे.

Saturday, July 2, 2016

२० विदेशींचे गळे चिरले

कुराणातील आयत म्हणता येत नाही ढाक्यात दहशतवाद्यांचा भयंकर हल्ला
ढाका, दि. २ (वृत्तसंस्था) - बांगलादेशची राजधानी ढाका येथे दहशतवाद्यांनी रेस्टॉरंटवर हल्ला करून ओलीस ठेवलेल्या २० विदेशी नागरिकांची गळा चिरून हत्या केली. कुराणमधील आयत म्हणता येत नसल्यामुळे विदेशी नागरिकांचे हत्याकांड करण्यात आले. मृतांमध्ये हिंदुस्थानी तरुणी तरूषी जैन चा समावेश आहे. दरम्यान, १३ तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. बांगलादेशात हायअलर्ट जारी केला आहे. ढाक्यासह अनेक ठिकाणी लष्कर तैनात आहे. ढाका येथे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुर्नरावृत्ती झाली. शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास डिप्लोमॅटीक झोन असलेल्या गुलशन परिसरातील अर्टीसन बेकरी रेस्टॉरंटमध्ये अल्लाह-हो-अकबरचा नारा देत ९ दहशतवादी घुसले. बेछूट गोळीबार आणि क्रुड बॉम्बस्फोट करीत ४० वर नागरिकांना ओलीस ठेवले. गुलशन परिसरात अनेक देशांचे उच्चायुक्त कार्यालये आहेत. अर्टीसन रेस्टॉरंटमध्ये नेहमीच विदेशी नागरिकांची गर्दी असते. विदेशी नागरिकांना टार्गेट करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला. बांगलादेशचे लष्कर, निमलष्कर आणि पोलीस जवानांनी रेस्टॉरंटला घेराव टाकला. रात्रभर येथे गोळीबार सुरु होता. सकाळी ७.२० च्या सुमारास लष्करी जवान आत घुसले आणि ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले असून, दोनजण फरार आहेत. रेस्टॉरंटमध्ये घुसल्यानंतर अवघ्या १३ मिनिटात ऑपरेशन संपल्याचे ब्रिगेडीयर जनरल नईम अश्फाक चौधरी यांनी सांगितले. १३ ओलीसांची सुटका करण्यात आली.  
बांगलादेशात फिरायला गेलेल्या तरूषीचा मृत्यू
१८ वर्षीय तरूषी जैन हिचा दहशतवाद्यांचा हल्ल्यात झालेल्या मृत्यूबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सुषमा स्वराज यांनी तरुषीचे वडील संजीव जैन यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दु:ख व्यक्त केले. या दु:खद प्रसंगी देश तुमच्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात शिक्षण घेणारी तरूषी सुट्टी असल्यामुळे बांगलादेशात फिरण्यासाठी आली होती. तिच्या वडिलांचा बांगलादेशात गेल्या २० वर्षांपासून कपड्यांचा व्यवसाय आहे. मैत्रीणींबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवून ठार मारले.  
लंडन, अमेरिकेतील विमानतळांवर उद्या हल्ले
इस्तंबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यापाठोपाठ अमेरिकेतील लॉस एंजलिस, जॉन एफ केनडी आणि ब्रिटनमधील हिथ्रो या विमानतळांवर सोमवारी ४ जुलै रोजी दहशतवादी हल्ले चढवण्याची धमकी 'इस्लामिक स्टेट' या खतरनाक दहशतवादी संघटनेने ट्विटरवरून दिली आहे. त्या दिवशी अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष असणार आहे. दहशतवादी हल्ल्यांचे टार्गेट विमाने असून हिथ्रो विमानतळावरून अमेरिकेला जाणार्‍या विमानांवर हल्ले चढवू, असे ट्विटवर म्हटले आहे. बॉम्बस्फोटांसाठीचे उपकरण विमानतळावर बसवले जाईल, असेही इस्लामिक स्टेटने म्हटले आहे.  
प्रत्येकाची ओळख परेड घेऊन गळे चिरले
दहशतवाद्यांनी अत्यंत क्रुरपणे विदेशी नागरिकांना ठार केले. प्रत्येक विदेशी नागरिकाला कुराणमधील आयत म्हणण्यास सांगितले. विदेशी नागरिकांना ते म्हणता न आल्याने २० जणांना वेचून गळे चिरले. यामध्ये तरूषी जैन ही हिंदुस्थानी आहे. १९ जणांमध्ये इटली आणि जपानचे नागरिक आहेत. २ पोलीस अधिकार्‍यांना गोळ्या घालून ठार केले. ३५ जण जखमी झाले आहेत.
 इसिस, अल कायदा, अन्सार इस्लामचा हात
या दहशतवाद्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. मात्र हल्ल्यामागे बांगलादेशातील अल कायदा आणि अन्सार इस्लाम सारख्या कट्टरपंथी इस्लामी दहशतवादी संघटना असल्याचा गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात इसिससह कट्टरपंथी इस्लामी संघटनांनी अनेक रक्तपात घडविले. अर्टीसन रेस्टॉरंटवर हल्ला करून जगाचे लक्ष वेधण्याचा दहशतवाद्यांचा कट होता असेही सांगितले जाते.  
हजार राऊंड गोळ्या, १०० स्फोट
दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा होता. रायफल्समधून तब्बल १ हजार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या आणि १०० बॉम्बस्फोट केले.  
'रमजान'मध्ये निष्पाप लोकांना ठार मारणारे हे कसले मुसलमान?
पवित्र रमजान महिन्यात निष्पाप नागरिकांची हत्या कशी काय करू शकतात? हत्याकांड करणारे सच्चे मुस्लिम असूच शकत नाहीत, अशा संतप्त भावना पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केल्या आहेत. ढाक्यातील हल्ला हा अत्यंत निंदनीय आणि अमानुष आहे. हत्या करणारे दहशतवादी हे मुस्लिम असू शकत नाही. दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नाही. दहशतवाद हाच त्यांचा धर्म आहे. दहशतवाद्यांना कोणीही थारा देऊ नये. बांगलादेशातून दहशतवाद्यांचा आणि कट्टरवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, असा निर्धारही पंतप्रधान हसीना यांनी व्यक्त केला.